पूरग्रस्त प्रती कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार झालेल्या प्रती कुटुंबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ आणि 5 लिटर केरोसीन मोफत देण्याची सूचना तहसिलदारांना दिली आहे. बाधित कुटुंबांकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य देण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे एनडीआरएफचे एक पथक कोसळलेल्या दरडीत बेपत्ता गितेश गावडे याचे शोधकार्य अद्यापही करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णतः पडझड झालेली 5, अंशतः पडझड झालेली पक्की घरे 260, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 24, 4 नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या आहे. तर 115 बाधीत गोठ्यांची संख्या आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये 39 गावातील 290 कुटुंबातील 1 हजार 271 व्यक्तींना आज अखेर सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 26 मोठी दुधाळ जनावरे, दोन लहान दुधाळ जनावरे आणि एक ओढकाम करणारे जनावर मृत झाले आहे. जिल्ह्यात शाळा, शासकीय इमारत अशा 17 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून 324 खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. महावितरणचे 32 लाख 91 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी अद्यापही पाणी आहे, अशा शेत पिकांचे पंचनामे वगळता इतर ठिकाणचे पंचनामे सुरू आहेत. लवकरच हे पंचनामे पूर्ण होतील. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'