स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा - प्रजित नायर
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22 करिता ग्रामीण भागात स्वच्छता सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये लोकसहभाग महत्वाचा असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच एसएसजी 21 ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग असून ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे जसे आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे यांची स्वच्छते संदर्भातील पडताळणी होणार आहे. या पडताळणीच्या माध्यमातून जिल्ह्याला 300 पैकी गुण देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये नागरिकांचा सहभाग नोंदवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर एसएसजी 21 हे ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता सुविधा यावरील प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांनी द्यायची आहेत. ग्रामस्थांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदविलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जिल्ह्याला 350 पैकी गुण मिळणार आहेत.
आपला जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपले मत नोंदवून जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 पुन्हा एकदा स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवावे, असे आवाहनही श्री. नायर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment