G-20 शिखर परिषदे अंतर्गत चीवला बीच येथे स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी,दि.21 (जि.मा.का.) : G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर आज रविवारी सकाळी 7 ते 9 वेळेत मालवण येथील चिवला बिचवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविली. G-20 शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण 37 किनाऱ्यांवर एकाच वेळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रशासनाच्या निर्देशानुसार मालवण नगर परिषदेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वी निसर्गाबरोबरच मानवी आरोग्याचा संदेश देण्यासाठी मालवण येथील योगज्योती या योगा क्लासेसच्या माध्यमातून अगदी मराठमोळ्या नऊवारी साडीत महिलांच्या योगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना स्वच्छतेविषयी जागृत करण्यासाठी सेल्फी केंद्र, सिग्नेचर फलक आदीची उभारणी करण्यात आली होती. स्वच्छता मोहिमेची सुरुवात समुद्राच्या स्वच्छतेची व सागरी जैवविविधता रक्षणाची शपथ घेवून करण्यात आली व किनारा स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी शासनाने नियुक्त केलेले केंद्र शासनाच्या गृह विभागाचे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती अरुणीमा, नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक मंदार केणी, पूजा सरकारे आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांना प्रशस्तीपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्लास्टिक ऐवजी पर्यावरणपूरक साधनांच्या वापरास प्रोत्साहन म्हणून नगर परिषदेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कचऱ्याचा विशेषतः प्लास्टिक कचऱ्याचा समुद्र आणि महासागरावर व येथील जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधणे तसेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व येथील परिसंस्थेचे जतन करण्यासाठी G-20 देशांमध्ये सामुहिक कृती करणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट होते. या आंतरराष्ट्रीय मोहिमेत जिल्ह्यातील मालवण चिवला बिचची निवड करुन मालवणला हा बहुमान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी केंद्र शासनाचे मालवणवासियांतर्फे आभार मानले. अरुणिता यांनी मालवणच्या निसर्ग सौंदर्याचे आणि विशेषतः चिवला बिच किनाऱ्याचे आणि हा किनारा कायमच स्वच्छ ठेवणाऱ्या येथील स्थानिक नागरिकांचे कौतुक केले. स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध संस्था, नागरिक, व्यवसायिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, पत्रकार, अशा विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागी अधिकारी व नागरिकांचे पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.जिरगे यांनी आभार मानले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'