ज्येष्ठांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी, दि.01 (जि.मा.का.) - सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यांत 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन जनसेवा फौडेशनद्वारे चालविली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार करुन ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, हा या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश आहे. राष्ट्रीय हेल्पलाईन ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी असून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फौडेशनद्वारे चालवली जात आहे. हेल्पलाईन ची वेळ सकाळी 8.00 वा ते संध्याकाळी 8.00 वा. असेल व वर्षातील 365 पैकी 361 दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये 4 दिवस बंद असेल त्यामध्ये (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर आणि 1 मे महाराष्ट्र दिन) या दिवसांचा समावेश असेल. या हेल्पलाईन मार्फत मिळणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे आहेत. माहिती- आरोग्य-जागरुकता, निदान, उपचार, निवारा / वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला करमणूक इ. मार्गदर्शन- कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.) आर्थिक, पेन्शन संबंधित, सरकारी योजना इ. भावनिक समर्थन- चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन, मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ.). क्षेत्रीय पातळीवर मदत - बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी इ. या हेल्पलाईनसाठी जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी (FRO) नियुक्त केलेले आहेत. तरी ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 या क्रमांकावर संपर्क साधवा. जेणेकरुन वृद्ध व्यक्तीची योग्य ती मदत करुन त्यांची काळजी घेता येईल असे आवाहन स्मितेश शहा, प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'