घरांचं स्वप्न 100 टक्के पूर्ण करणारा जिल्हा म्हणून देशाला संदेश देवू -पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जिमाका)- प्रधानमंत्री आवास योजनेत 99 टक्के उदिद्ष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे मनापासून कौतुक करतो. रमाई आवास योजनेतही 87 टक्के उदिद्ष्ट्य पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात 100 टक्के उदिद्ष्ट्य पूर्ण करुन जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर असेल. सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करतोय, हा संदेश देशाला देवू, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यात घेतलेल्या महा आवास अभियानातील पुरस्कार प्रदान सोहळा पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपस्थित होत्या. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, घरे बांधतान नैसर्गिक आपत्तीत बाधात होणार नाहीत आणि मालमत्तेची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. घरे बांधल्यानंतर ती आणि परिसर स्वच्छ राहील याबाबत जिल्हा परिषदेने सव्हेक्षण करावे. म्हाडाप्रमाणेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतचा स्वच्छतेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती सावंत म्हणाल्या, सर्व यंत्रणेने चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याला ५ वा क्रमांक मिळाला आहे. प्रगतीपथावर असणारी कामेही पूर्ण करुन उद्दिष्ट्यपूर्ती करु. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाचे तालुके, ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजने प्रथम पुरस्कार कुडाळ तालुक्याने पटकावला तर द्वितीय पुरस्कार वैभववाडी तालुका आणि देवगड तालुक्याला तृतीय पुरस्कार मिळाला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेंतर्गहत वैभववाडी तालुक्याने प्रथम पुरस्कार मिळवला. तर द्वितीय क्रमांक सावंतवाडी आणि तृतीय क्रमांक कुडाळला मिळाला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वाडोस, ता. कुडाळला पहिला, आखवणे भोम, ता. वैभववाडीला दुसरा आणि सडुरे शिराळे, ता. देवगडला तिसरा पुरस्कार मिळाला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आपास योजनेत अणाव, ता. कुडाळ प्रथम, मांगवली, ता. वैभववाडी द्वितीय आणि सो.त.कळसुली, ता. कुडाळला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांनी यावेळी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'