राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकाच दिवशी 909 प्रकरणे निकाली पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का): वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावे यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 909 प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्यात आली. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रकरणांचा निकाल लावण्यात आल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. तडजोडीने वाद सोडवण्यासाठी लोक अदालत महत्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हाडे यांनी व्यक्त केले. आज पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण तीन पॅनेल तयार करण्यात आले होते. पॅनेल क्रमांक 1 वर प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधिश - 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.बी.रोटे यांनी काम पाहिले असून पॅनेल सदस्य म्हणून ॲड्. सतीश खानोलकर व ॲड्. रुपाली प्रभू यांनी काम पाहिले. पॅनेल क्रमांक 2 वर पॅनेल प्रमुख म्हणून दिवानी न्यायाधिश एम.बी.कुरणे यांनी काम पाहिले असून पॅनेल सदस्य म्हणून ॲड्. अशपाक शेख व ॲड्. पी.एस.काजरेकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्रमांक 3 वर पॅनेल प्रमुख म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी ए.एम.कुडतरे यांनी काम पाहिले. पॅनेल सदस्य म्हणून ॲड्. एस.एस.कुलकर्णी व ॲड्. एम.पी.नाईक यांनी काम पाहिले. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. हाडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. म्हालटकर यांच्या मार्गदर्शना खाली आजची राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे 3 हजार 123 पैकी 202 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर वादपूर्व 6 हजार 299 प्रकरणांपैकी 707 प्रकरणे अशी एकूण 909 प्रकरणे या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. या लोक अदालतीमध्ये खर्च तसेच वेळ वाचल्याची भावना अनेक पक्षकारांनी व्यक्त केली. जिल्ह्या न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील न्यायालयांमध्ये लोक अदालत संपन्न झाली. या लोकअदालतीचे यशस्वी आयोजनाकरिता न्यायालयीन व्यवस्थापक श्री. मालकर, अधिक्षक एन.बी. गंगानाईक, एन.पी.मठकर तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'