स्वच्छ सर्वेक्षण पडताळणी मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : स्वच्छ भारत मिशन ग्रा.टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 ही पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत पडताळणी उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेला परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 साठी सर्व ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे. या सर्वेक्षणात लोकांचा सहभाग वाढवुन, जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. सन 2018 पासुन केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही ग्रामपंचायतींची पडताळणी मोहीम सुरु केली आहे. या सर्वेक्षणातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच राज्य यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे. स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रा. अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आलेल्या स्वच्छवता सुविधांचा शाश्वत वापर करणे हा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील ग्रामीण भागात अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Academy Of Management Studies) या केंद्र पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडुन गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नमुना निवड पध्दतीने गावांची निवड करुन, ॲपच्या माध्यमातुन हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्लास्टीक संकलन केंद्र (PMU), गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन या प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 गुणांकन पध्दत ( एकूण 1000 गुण )- ऑनलाईन प्रणाली वरील प्रगती 240 गुण, गावातील प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण 540 गुण, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रकल्प थेट निरीक्षणासाठी 120 गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी 100 गुण असे एकूण 1000 गुणांच्या आधारे ग्रामपंचायत, जिल्हा, राज्य यांचे मुल्यांकन होणार आहे. केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीवरील उपलब्ध माहितीचे यामध्ये जिल्हा निहाय मुल्यांकन करण्यात येणार आहे. नमुना पध्दतीने निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणाव्दारे मोबाईल ॲपवर माहिती भरली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबांना भेटी देणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे, शाळा, अंणवाडी, ग्रामपंचायत या संस्थात्मक ठिकाणी भेटी देणे, सार्वजनिक शौचालय पाहणी, स्वच्छता संदेश यांची पाहणी, तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांची माहिती घेवून फोटो जिओ टँग केले जाणार आहेत. गावांमध्ये कुटुंबांच्या भेटीवेळी घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक शौचालयाचा वापर, हात धुण्याच्या सवयी तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व त्याकरिता असलेली सुविधा शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम इत्यादीबाबत माहिती घेतली जाणार आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर उभारण्यात आलेले गोबरधन प्रकल्प, प्लास्टीक संकलन केंद्र (PMU), मैला गाळ व्यवस्थापन केंद्र यांची पाहणी होणार आहे. तसेच नागरीकांचा अभिप्राय मोबाईल ॲपच्या माध्यमातून व प्रत्यक्ष गावातील भेटी वेळी अशा दोन टप्प्यात घेतला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.तर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लोकसहभाग व श्रमदानातून स्वच्छतेच्या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी, स्वच्छता सर्वेक्षण 2025 मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. BOX जिल्हावासियांनी गुगल पे स्टोअर वरुन स्वच्छ सर्वेक्षण ग्रमिण 2025 (SSG 2025) हे ॲप डाऊनलोड करुन सिंधुदुर्ग जिल्हा निवड करुन अभिप्राय द्यावा. आपल्या अभिप्रायामुळे जिल्हाच्या गुणांकन मिळणार आहे. तरी जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्याकरीता जिल्हावासियांनी अभिप्राय नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'