इतर सर्व विद्यापीठीय परीक्षार्थिंना पुढील वर्षात प्रवेश देण्यात येणार
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 08 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परिक्षांविषयी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक 1 जुलै ते 30 जुलै या दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आज विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
समितीने दिलेल्या अहवाला विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, जर महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन वाढला तर पुन्हा एकदा 20 जुन पर्यंत या विषयी फेर आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदय यांनी दिल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी नुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स ही त्यांना दिले जातील. ही मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी 50 टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत व 50 टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांच्या बाबत 100 टक्के अंतर्गत मुल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णय ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, तसेच शैक्षणिक वर्षाचेही नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचे शंका निरसन करण्यासाठीचे सेल कार्यरत करावे अशा सूचना देऊन श्री. सामंत यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी व पालक यांच्या सामुपदेशनासाठी जिल्ह्यात केंद्र स्थापन करावे. अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान परीक्षा होणर आहेत हे नजरेसमोर ठेऊन अभ्यास सुरू करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांनीही सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घरा बाहेर न पडता घरातच रहावे. उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे 1 सप्टेंबर पासून सुरू करावयाचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे. समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहमीती दर्शवली आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीच्या सीईटीच्या परीक्षा 1 जुलै ते 19 जुलै, तसेच पदव्युत्तर अभ्याक्रमासाठीच्या सीईटी 20 ते 31 जुलै दरम्यान होणार आहे. अंतिम निलाक व बॅकलॉग परीक्षा निकाल 15 ऑगस्ट 2020 पर्यंत लावणेत येणार आहेत. या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे गृहीत धरूनच त्यांची उपस्थित लिहण्यात येणार आहे. यानिर्णया मुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी आशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही श्री सामंत यांनी यावेळी केले.

Comments
Post a Comment