जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात जास्तीत जास्त राबविण्यासाठी काम करा - पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.- 28 : जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त गावांना दिलासा देणारी आणि पिण्याचे स्वच्छ व चांगले पाणी पुरवठा करणारी जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात जास्तीत जास्त राबविण्यासाठी काम करावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी विकास जिल्हास्तरीय समिती, खनिकर्म निधी नियोजन, दिव्यांगांसाठीच्या निधीचे नियोजन या सह विविध विषयांवर बैठका पार पडल्या. त्यावेळी श्री. सामंत यांनी या सूचना दिल्या. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच डोंगरी विकास समितीचे अशासकीय सदस्य वर्षा कुडाळकर, विलास साळसकर, संजय गवस, दिव्यांग सेस निधी समितीचे अशासकीय सदस्य शेखर आळवे, प्रकाश कदम, राजेंद्र मेस्त्री उपस्थित होते. डोंगरी विकासचा निधी यंदाच्या 31 मार्च पर्यंत खर्च होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश द्यावेत असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, जल जीवन मिशनच्या 15 लाख रुपयांच्या कामाच्या मर्यादेमध्ये गाव संपूर्ण टंचाई मुक्त होते का याचे सर्वेक्षण करावे. त्याप्रमाणे जर जास्तीचा निधी लागत असले तर तसे प्रस्ताव तयार करावेत, जल जीवन मिशनकडे अभियंता कमी आहेत. त्यासाठी आऊट सोर्सिंगकरून भरती करावी व त्यामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य द्वावे. खनिकर्मच्या निधीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, खाण क्षेत्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. ज्या गावामध्ये खनिज क्षेत्र आहे. तेथे प्रत्येक तालुक्यातील एका गावात या प्रमाणे प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात यावी. रस्ते, नळपाणी, आरोग्य या बाबत निधी वाटपाच नियोजन करावे व जिल्ह्यात सर्वत्र समान निधीचे वितरण होईल असे पहावे, गरजेनुसार महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. दिव्यांगाच्या बाबत बोलताना श्री.सामंत यांनी, दिव्यांगाना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठीचे नियोजन करावे अशा सूचना त्यांनी संबंधितांन दिल्या. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'